रत्नागिरी ः महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Farmer Loan Waive) प्रोत्साहनपर लाभ योजनेतील (Farmer Incentive Scheme) पहिल्या यादीत जिल्ह्यातील १२ हजार ९४२ शेतकऱ्यांचा समावेश होता. यातील १२ हजार ८८० शेतकऱ्यांना आतापर्यंत लाभ मिळाला आहे; मात्र उर्वरित ६२ शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण (Aadhar Verification) केलेले नाही. त्यामुळे पहिली यादी १०० टक्के लाभ मिळण्यापासून वंचित राहिली आहे. दुसरी यादी अद्याप जाहीर न झाल्याने लाभासाठी अर्ज दाखल केलेले १० हजार शेतकरी प्रतीक्षेत आहेत.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
शेती व शेतीशी निगडित कामांसाठी शेतकरी व व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेतात. २०१५-१६ ते २०१८-१९ या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर केली होती. राज्याच्या काही भागांत अवेळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे मागील काही वर्षांत शेती निगडित कर्जाची परतफेड होऊ शकली नव्हती.
परिणामी, शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या दुष्टचक्रात अडकलेला होता. त्यामुळे त्यांना नव्याने पीककर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या शेतकऱ्यांना २०१९ मध्ये महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली होती; पण अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड नियमित केली होती. त्यांना लाभ मिळाला नव्हता.
Mahatma Jyotirav Phule Shetkari Karjmafi Yojana
त्यामुळे नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार रुपयांची प्रोत्साहन अनुदान देणारी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ देणारी योजना लागू केली आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून ही योजना अमलात आणली असून, नियमित परतफेड केलेले कर्ज प्रोत्साहन अनुदान असलेल्या ५० हजारांपेक्षा कमी रकमेचे असल्यास त्यांनी उचल करून परतफेड केलेल्या रकमे एवढी रक्कम प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्याचे जाहीर केले होते.
Karjmafi Yojana
प्रोत्साहन लाभ योजनेची पहिली यादी जाहीर होऊन महिना उलटला; मात्र शासनाने अद्याप दुसरी यादी जाहीर केलेली नाही. प्रोत्साहन लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यातील २३ हजार ५९० शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केला आहे. यातील १२ हजार ९४२ शेतकऱ्यांचा पहिल्या यादीत समावेश आहे. अद्याप १० हजार ७४८ शेतकऱ्यांची नावे आलेली नाहीत. दुसऱ्या यादीत त्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
लाभ थेट खात्यात जमा
रत्नागिरी जिल्ह्यात याची पहिली यादी शासनाने जाहीर केली होती. त्यात जिल्ह्यातील १२ हजार ९४२ शेतकऱ्यांचा समावेश होता. पहिल्याच दिवशी ९ हजाराच्या वर शेतकऱ्यांच्या खात्यात ही प्रोत्साहन रक्कम जमा झाली होती. नोव्हेंबर अखेरपर्यंत १२ हजार ८८० शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे. एकूण ३१ कोटी ८३ लाख रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे. मात्र शिल्लक राहिलेल्या ६२ शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नाही